अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का




भारतासारख्या विकसनशील देशाने अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का? आणि का?

आपल्या देशाच्या आकारमानाने हा खर्च अवाढव्य नक्कीच नाही. अवाढव्य खर्च हे विशेषण संरक्षण खर्चाच्या बाबतीत योग्य शोभेल.

भारताला स्वतःचा अवकाश कार्यक्रम का हिताचा आहे, हे आता सर्वश्रुत आहेच.

मी तुम्हाला एक आणखी बाजू सांगतो.

कोणत्याही देशाला त्याची ओळख बनवावी लागते. बनवली नाही तरी ती आपसूक बनते. काहीवेळा चांगली असते काहीवेळा देशांतर्गत दुर्जनांमुळे किंवा देशाबाहेरच्या हितशत्रूंमुळे वाईटही ओळख बनते.

सरकार वेळोवेळी इनक्रेडिबल इंडिया सारख्या जाहिरात मोहीमा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावण्याचे काम करत असते. पण अशा जाहिराती एका ठराविक मर्यादेपर्यन्तच काम करू शकतात.

तरीही अशा आंतरराष्ट्रीय जाहिरातींना काही कमी खर्च येत नाही.[१] मग त्यापण करू नयेत का?

आता तुम्ही म्हणाल इथे अवकाश मोहिमांचा काय संबंध?

आहे. भारताच्या अवकाश मोहीमा हा त्याच्या ओळखीचा, ब्रॅण्डिंग चा भागही आहेत. वैज्ञानिक प्रगती, स्वनिर्मित तंत्रज्ञान, परकीय चलन, भविष्यामधील आव्हानांची तयारी, प्रगत देशांच्या मध्ये मान आणि शत्रुदेशांना धाक या पलीकडेही त्यांचे काही फायदे आहेत.

तुम्हाला एक गोष्ट सांगतो.

दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर संपूर्ण जगामध्ये भारताची मानहानी झाली. झाले ते लज्जास्पद होते यात दुमत नाही. पण त्यामुळे भारतद्वेष्ट्या लोकांना एक आयते कोलितच मिळाले. त्या काळात एका जर्मन प्राध्यापकाने उच्चशिक्षित भारतीय विद्यार्थ्याला या कारणामुळे प्रवेश नाकारला की त्यांच्या संशोधन गटामधल्या मुलींच्या सुरक्षेची त्यांना काळजी वाटत होती. [२] हे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर असा प्रकार होता.

मी युरोप मध्ये होतो त्यावेळी मी असल्या पूर्वग्रहदूषित लोकांचा प्रत्यक्षपणे अनुभव घेतला आहे.

आता त्याच्या पुढच्याच वर्षी भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. ती जगभर चर्चेचा विषय झाली. बाकीच्या वाईट चर्चा मागे पडल्या.

ब्रॅण्डिंग हे असे बनते. मग आता मला सांगा, की भारताचे जर ब्रॅण्डिंग करायचे असेल, तर नुसतेच इनक्रेडिबल इंडिया बोंबलत अब्जावधी खर्च करायचे कि अशा जगभर कुतूहलाचा विषय असलेल्या अवकाश मोहिमांसारख्या गोष्टींवरपण खर्च करायचा? या जगात चमत्काराशिवाय नमस्कार नाही. अहो या अवकाश मोहीमा आपले उद्दिष्ट तर साध्य करतातच पण आणखी देशाची प्रतिमा पण सुधारतात.

भारतासारख्या खंडप्राय देशात रोज कोट्यवधी चांगल्या गोष्टी घडत असतील त्याची दखल कोणी घेणार नाही पण काही वाईट गोष्टी देशाची प्रतिमा डागाळतात. भारतीय असल्याचा एक तोटा असाही आहे की मी पुण्यात असलो आणि काही वाईट गोष्ट अडीच हजार किलोमीटर वर असलेल्या शहरात घडली तरी एक भारतीय म्हणून मलाही जाब विचारला जातो. हे अंतर जर यूरोप मध्ये गृहीत धरले तर घटना घडली ते शहर ४-५ देशांच्या सीमांपलीकडच्या शहरात असेल. पण बाहेरच्या लोकांना भारत म्हणजे त्यांच्या देशांसारखा एकजिनसी पदार्थ वाटतो. त्यांना पुणे काय पाटणा काय दिल्ली काय चेन्नई काय सारखेच.



उलट दृष्टीने बघितले तर या गोष्टीचा एक फायदाही आहे की एक भारतीय म्हणून अवकाश मोहिमेसारख्या क्लिष्ट गोष्टीचा माझ्याशी संबंध नसला तरी त्याने माझी, माझ्या कंपनीची, सर्व भारतीयांची प्रतिमा जगभरात सुधारते. एक आत्मविश्वास, आशावाद निर्माण होतो. याला म्हणत्यात ब्रॅण्डिंग.

गेल्या ५० वर्षाच्या इतिहासामध्ये इसरोने वेळोवेळी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. भारताची ती सर्वात यशस्वी संस्था असावी. अशा या संस्थेने एक गरीब देशाची प्रयोगापुरती अवकाश संस्था ते रास्त दरात उपग्रह सोडणारी व्यावसायिक संस्था ते आंतरग्रहीय मिशन यशस्वी करणारी एक सन्माननीय संस्था इतपत मजल मारली आहे. अशा संस्थेवर खर्च करायला हात आखडले तर आपल्यासारखे करंटे आपणच. यशस्वी असली तरी इसरोला नासा, ESA या संस्थांपेक्षा कितीतरी कमी निधी मिळत आहे.

मागच्या दशकभरात यशस्वी केलेल्या या मोहिमांनी भारताला एक अवकाश शक्ती म्हणून मान्यता मिळवून दिली आहे.

१. चांद्रयान - १ - चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा मिळवणारे

२. मंगळयान - पहिल्याच प्रयत्नात मंगळ गाठण्याची किमया करून दाखवली. या मोहिमेचा खर्च ग्रॅव्हिटी या हॉलिवूड पटापेक्षा कमी होता या पंचलाइनमुळे जगभर गाजली.

३. एकाच रॉकेटमार्फत सर्वात जास्त १०४ उपग्रह कक्षेत सोडले

४. लो अर्थ ऑर्बिट मधल्या उपग्रहाचा क्षेपणास्त्राने अचूक भेद. अशी क्षमता असलेला भारत ३रा देश

५. चांद्रयान - २ - चंद्राच्या ध्रुवावर लॅण्डर उतरवण्याचा प्रकल्प चांगलाच लक्षवेधी ठरला.

आज या मोहिमांवर चित्रपट काढण्यासाठी चढाओढ आहे. आपली मुले कोरावर "इसरो मध्ये शास्त्रज्ञ कसे व्हावे" हे प्रश्न विचारात आहेत हेही या मोहिमांचे एक यश आहे.

तर शेवटी हेच म्हणेन की ब्रॅण्डिंग साठी सुद्धा या अवकाश मोहीमा फार मोठी कामगिरी बजावत आहेत.


१.  Indian tourism on a high (इनक्रेडिबल इंडिया कॅम्पेनच्या खर्चाचे आकडे)
२. German professor refuses internship to Indian student citing ‘rape problem’, backtracks

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक