देअर गोज माय फॉर्चूनर






युरेका! युरेका!
माझा देश ऑलिम्पिक मध्ये पदकं का मिळवत नाही, गेल्या शतकभरात आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नोबेल का मिळाले? याचे उत्तर मला समजले. म्हणजे माहीत होते, पण आता अनुभवामुळे समजले.
आज एकदम पिच्चर सोडून हा विषय का? का? मी काय फक्त ताडोबा, दांडेली, हम्पी अशा उनाडक्याच करत हिंडतो का? म्हणजे घरात काही लक्षच नाही माझे? मी काय जबाबदारी घेतच नाही का? म्हणजे असेलही खरे.. पण म्हणून सुरुवातच करायची नाही हे कुणी सांगितलंय. तर अशाच माझ्या उडाणटप्पू स्वातंत्र्यावर टपलेल्या कुटुंबियांच्या दबावापुढे झुकून मी म्हटले की आता आपण फमिली म्याटर्स मध्ये लक्ष घालायला हवे. आणि वॉर्म अप म्हणून डायरेक्ट कोर्ट कचेऱ्यांचा मार्ग निवडला.

झाले असे की इतर तमाम मराठ्यांच्या घरामध्ये असतो तसा आमच्याकडे पण एक जमिनीचा वाद चालू आहे. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली की माझे काका, वडील एकत्रपणे या गोष्टी बघत होते आणि वंशपरंपरेने तो आता आमच्या पिढीकडे सोपवण्यात आलाय. हा वाद कुठला, कोणाचा, त्यात चूक कोणाची हे सर्व सांगणे हे या पोस्टच्या आणि माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे.

तर, माझा मोठा चुलत भावाने जेव्हापासून या वादाची धुरा सांभाळली तेव्हापासून दोन्ही बाजून समेट घडवून आणायच्या प्रयत्नांना गती मिळाली. आणि एक दिवस तडजोड होऊन ठरल्याप्रमाणे आमच्या आणि प्रतिवादी कुटुंबाला वकिलांनी घोडेगावच्या दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात बोलावले. खरेतर तिथे आमच्या पिढीचे काम नव्हते. पण आता तिथे मागल्या पिढ्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडून सगळे मुसळ केरात जाऊ नयेत म्हणून मी आणि आणि माझा भाऊ पण गेलो. वार बुधवार. त्यामुळे दोघांच्या ऑफिस ला दांडी. वडील आणि एक काका निवृत्त असल्यामुळे त्यांना सुट्टीच. पण सर्वात लहान काकांनाही रजा घ्यावी लागली. सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे आमचे आजोबा. ते आता थकलेत. या सगळ्या प्रकारात आता त्यांना काय चालले आहे ते पण समजते की नाही देव जाणे. त्यांना पुण्याहून घोडेगाव ला नेणे म्हणजे जास्त त्रासदायक. पण ह्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायचाच या इरेने आम्ही सर्व जण पुण्याहून सकाळी लवकर निघून निबंधाकांचे ऑफिस उघडण्याच्या आत १०-१०.१५ ला तिथे पोहोचलो.

सुरळीतपणे दस्तांचे वाचन झाल्यानंतर नोंदणीसाठी आमच्या पाळीची वाट पाहत बसलो. आमच्यासारखे तिथे बरेच जण होते. त्या सर्वांनाही आमच्याप्रमाणेच आधी वेळ ठरवून दिली होती.
बाबांना (म्हणजे आजोबांना) कचेरीच्या दत्तमंदिराच्या कठड्यावर बसवले. हे तिघे बंधू ओळीने त्यांच्या शेजारच्या चौथऱ्यावर. भाऊ ऑफिसमधून येणाऱ्या फोनवर आणि मी निबंधकाच्या ऑफिसच्या उंबऱ्यात 'गोंद्या आला रे' आरोळी मारायच्या प्रतीक्षेत. प्रतिवादी कुटुंब पण तिथेच होते. एकेकाळी सख्खे सोयरे आता एकमेकांकडे नुसतेच डोळे वटारून आणि कुत्सित भावनेने पाहत होते.
मनात धाकधूक होतीच की इतक्या वर्षांच्या या हमरीतुमरीनंतर आज सगळे व्यवस्थित तर होईल ना?

घात झालाच..लाईट गेल्याची वार्ता पसरली. लाईट गेली? सगळे संगणक तर चालूच होते. मग कळले की इंटरनेट कनेक्शन गेले. सरकारने मागील काही महिन्यापासून ई-गवर्नंस खाली सगळे दस्त, करार नोंदणी ई-सरिता या प्रणालीने सरळ सेंट्रल डेटाबेसमध्ये टाकायची सोय केलीये. इतर सगळ्या सरकारी योजनांप्रमाणे उत्कृष्ठ विचार आहे. पण अंमलबजावणीचा बोजवार्या उडवण्याची परंपरा इथे कशी सोडता येईल? तालुकास्तरावरच्या गावांना त्या प्रकारचे इंटरनेट कनेक्शन अजून मिळालेय का याची पडताळणी नीट झाली नसावी. याचा प्रत्यय येणं आमच्याच नशिबी होतं.

"१५ मिनिटात होईल सुरळीत" इति तिथला कारकून. ठीके म्हटलं, पाहूया वाट. अर्धा तास झाला. आतून परत नवीन बातमी. कुठलातरी टॉवर ला काहीतरी प्रॉब्लेम आलाय. दुपारी २ वाजेपर्यंत ठीक होईल. सगळीकडे निराशा. लांब लांब वरून जमिनीचे दस्त करायला आलेलं पब्लिक, वाट पाहण्याशिवाय पर्यायही नव्हता.

भाऊ आणि मी जवळच्या मिसळपावावर ताव मारून आलो. एक नम्बर मिसळ हो.. काय सांगू.. जाउदे. या पोस्टचा विषय नाही तो. तिन्ही बंधू काही खाण्याच्या मूड मध्ये नव्हते. तरी वाटले काही तरी असावे चघळायला म्हणून त्यांच्यासाठी आणि बाबांसाठी वडे आणि भेळ आणून दिली. मी बाबांशेजारी जाऊन बसलो. बाबा कातर आवाजात विचारायला लागले किती वेळ आहे. त्यांना कल्पना दिली की अजून बराच वेळ आहे. मग ते गुडघे चेपत बसले. बाबांना नातवांपैकी कुणीतरी कधीतरीच भेटते असे निवांत. मग त्यांच्या भूतकाळात गेले. येताना ज्या रस्त्याने आलो त्याच्याविषयी सांगायला लागले. मध्येच तो आमदाराचा बंगला आठवला त्यांना. मग त्याच्याकडे आधी काहीच कसे नव्हते आणि मग आमदारकी मिळाल्यावर कसा माजला आणि गावासाठी काहीच केलं नाही. वगैरे वगैरे. मग आजकाल राजकारण्यांनी देशाची कशी वाट लावली याच्यावर कीर्तन चालू झाले. आमचे बाबा तसे सोज्व्वळ. पण एकदा पारा चढला की शिव्यांचा असा धबधबा चालू होतो की त्राही माम! जसे राजकारणावर घसरले तसे मग त्या आमदाराच्या घराण्याचा उद्धार चालू झाला. "अहो बाबा हळू.." मी मधेच आवरायचं. मग करता करता आमदाराच्या कुठे कुठे आणि कशा कशात काठ्या आणि तत्सम गोष्टींचे आवागमन मोठमोठ्यांदा करायला लागले तेव्हा मी न राहवून म्हंटले की बाबा आपण देवळाच्या दारात बसलोय. तर बाबा म्हणे "की मग काय खोटं कुठं बोलतोय".

अशात २ वाजले. मग तीन वाजले. आता मात्र लोकांचा संयम सुटत चालला होता. ५.३० - ६ ला हे ऑफिस बंद करणार आणि आमचा फेरा वाया जाणार या कल्पनेने आम्ही पण बेचैन झालो होतो. कचेरीतली लोकं "आम्ही काय करणार याला?" अशा अविर्भावात मस्त पहुडलेली होती आपापल्या खुर्च्यांमध्ये. कचेरी बाहेरच्या भिंतींवर तक्रारीसाठी पुण्याच्या अधिकाऱ्यांचे नंबर दिले होते. तू कर मी कर याच्यात मी त्यातला एक नंबर लावला. तो अपेक्षेप्रमाणे कोणी उचलला नाही. मग दुसरा लावला. तो चक्क उचलला! मी त्यांना कुठून व कशासाठी फोन केलाय याची माहिती दिली. त्यांनी पण सांगितले की संबंधित इंटरनेट कंपनीने तिकडे तंत्रज्ञ पाठवलेत आणि ते काम चालू आहे. आणि फोन ठेवला. म्हणजे एवढे तरी नक्की झाले की निबंधकाच्या कचेरीतले कारकून खरेच सांगतायेत.

तिथे एक मुंबईवरून आलेल्या बाई होत्या. सई परांजपे स्टाईल केशभूषा. त्यांची तर फारच चीडचीड झाली.

 

मुंबईवरून हेलपाटा? त्यांनी एव्हाना मंचरच्या कुणा पत्रकाराला फोन लावला होता. पत्रकार महाशय आले. त्यांना पाहून निबंधक बाई खुर्चीतून उठल्या एवढाच काय तो फरक पडला परिस्थितीत. मग याला उपाय काय? तिथेच खलबत चालू झाले. लोकांनी आपापले अनुभव आणि मागे कसे एकदा असेच झाले होते हे सांगितले. कोण कोण कुठून कुठू आलंय याचे पाढेवाचन झाले.
पत्रकारांनी मग तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा वळवला. तहसीलदार तिथे नव्हते. 'इ-सरिता जोपर्यंत व्यवस्थित रित्या बसवली जात नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्थेने आधीसारखे दस्त नोंदवून घ्यावेत' अशी सूचना करणारा अर्ज तयार झाला. अर्थात त्याच्यावर त्या दिवशी कुणी अंमलबजावणी करेल याची सुतराम शक्यता नव्हतीच. तरीपण आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या मारल्या. निबंधकाच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांनी सगळ्यांचे ग्रुप फोटो काढले. त्यात आमच्या बाबांना(आजोबांना) पुढे घेवून फोटो जास्तीत जास्त परिणामकारक होईल याची काळजी घेतली. परांजपे स्टाईल बाई एव्हाना शांत झाल्या होत्या. त्यांच्या या करामतीचे सगळ्यांना कौतुक होतेच.

आता मात्र निबंधकाच्या कर्मचाऱ्यांचा पण बांध फुटला. त्यांना पण कसे नंतर एक्स्ट्रा काम करून हा आजचा लॉट संपवावा लागेल हे सांगायला लागले.

यात माझी आणि भावाची धाकधूक वाढली. येन केन प्रकारेण हे वर्षानुवर्षाचे भिजत घोंगडे प्रकरण आणखी परत किती दिवस चालणार कोणाला माहिती. मनात विचारचक्र चालू झाले. आमची सहा माणसे आणि प्रतिवादी ४ ते ५. अशीच बाकीची कुटुंबे. प्रत्येकाचा दिवस वाया गेला. देशाच्या प्रत्येक कचेरीत मिळून या राष्ट्राचे कोट्यावधी मनुष्य-तास अक्षरश: वाया जातायेत. अन्नाची, पेट्रोलची नासाडी डोळ्यावर येते. पण वेळेचे काय? सरकारच्या अशा पिचक्या कारभारामुळे आज भारतातला नोकरदार, कामगार, शिक्षक, व्यवस्थापक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, कलाकार सगळे त्यांच्या core competency ला लागणारा वेळेचा त्याग करून कुठे आधार कार्ड काढ, कुठे पासपोर्टच्या कार्यालयात खेटे घाल, कुठे विजेचे, फोनचे अवाच्या सवा आलेले बिल कमी कर, जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी, मॅरेज सर्टिफिकेट, जातपडताळणी, डोमिसाईल असल्या दाखल्यांच्या रांगेत लागलेले आहे. अशा समाजात काय निर्माण होणार जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि खेळाडू?


जयंत नारळीकरांच्या "चार नागरांतले माझे विश्व" मध्ये त्यांनी केम्ब्रिजवरून भारतात स्तलांतर केल्यानंतरचे वर्णन आहे. वाचता वाचता सगळा समा बदलतो. कुठे ते केम्ब्रिज मधल्या शास्त्रीय चर्चा, व्याख्याने, हायकिंग, सुखावणारी निवांत युरोपमधली भटकंती आणि कुठे भारतातली प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीसाठी चाललेली धडपड. एका प्रसंगात तर त्यांनी TIFR मधल्या शास्त्रज्ञांना सरकारने दर दिवसाचा दुधाचा कोटा वाढवून द्यावा म्हणून मंत्रालयात अर्ज घेवून गेल्याची आठवण सांगितलीये. कधीकधी जयंताला फोन करून सांगावेसे वाटते की अरे तू स्टेडी स्टेट विश्वाच्या मागे लागून नाही तर स्वदेशात परतून नोबेल गमावलेस. असो, जोक्स अपार्ट.. ही झाली ७०-८० च्या दशकातली गोष्ट. पण आताही परिस्थिती अगदी अलबेल नाही.

मागे एकदा म्हटल्या प्रमाणे या परिस्थितीला राजकारण्यांबरोबर शासकीय अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. एक दिवस स्वत:च्या कार्यालयात सामान्य नागरिक म्हणून गेले तरी यांना सगळ्या व्यथा कळतील. पण कुठे जमिनी घे, कुठे फ्ल्याट घे, वीक, परत घे.. अशा भानगडीत गुंतल्यावर त्यांना तरी कुठे दिसतील या व्यथा.

भारतात गरीबी हटवायची असेल तर परिणामकारक गवर्नंस हे पुरेसे आहे. सरकारी कार्यालयात वाया जाणारा वेळ माणूस आपली क्षमता वाढवण्यात खर्च करेल. त्याची चीडचीड न होता आनंदी होईल. मग याचा परिणाम सगळीकडेच दिसेल. अगदी सिनेमे जास्त पाहण्यापासून पर्यटनापर्यंत सगळ्यांचाच फायदा होईल यात. बॉलीवूडचे सिनेमे हॉलीवूडपेक्षा जास्त व्यवसाय करतील.

हे झाले स्वप्नरंजन. जमीनीवर येवूया. हे चित्र एका रात्रीत बदलण्याची क्षमता जरी असली तरी सद्यपरिस्थिती पाहता त्याची शक्यता कमीच आहे. याच्यावर उपाय काय?

१. सरकारी कार्यालयात आनंदी राहणे. गोड बोलून कामे उरकून घेणे. लायकी नसलेल्या लोकांना सर्/म्याडम म्हणावे. डोके थंड ठेवावे. कधीकधी चूक आपल्या कागदपत्रांत पण असू शकते. अशा वेळी त्रागा करण्याने काहीही होत नाही.
२. विलंब होत असेल तर पर्यायी मार्ग तपासणे. चिंधी कामासाठी उगाच अमूल्य वेळ आणि मनशांती वाया न घालवता चिरीमिरी देवून ते उरकणे.
३. सहसा सरकारी कार्यालयात एकाचे काम असेल तर दोघांनी जावे. त्याने टाईमपास चांगला होतो.
आणि कधी कधी एकाची नाही तर दुसऱ्याची तरी ट्यूब पेटते.[1] एखादे कागदपत्र घरीच राहिले किंवा इकडच्या टेबल वरून तिकडे जाण्यासाठी नंबर लावणे, ओळखी काढणे इत्यादी कामासाठी चागला उपयोग होतो.
४. परवडत असल्यास सरळ एजंट पकडणे. पण हे करण्याआधी सरकारी कार्यालयांचा अनुभव अवश्य घ्या नाहीतर आपले इतर गरीब देशबांधव रोज कुठल्या दिव्याला सामोरे जातायेत हे कधीच समजणार नाही.
५. अगदीच मुजोर कारकून असतील तर क्रांती करायची तयारी ठेवावी आणि सीनियर्स ला भेटावे.
६. कुणी प्रामाणिकपणे आणि उत्तम काम करत असेल तर त्याची पावती म्हणून हसून त्याला थँक यु जरूर म्हणावे.

तर कुठे होतो आपण.. हां घोडेगाव दुय्यम निबंधक.
तर तिथल्या कारकुनांनी ४-४.३० नंतर लोकांच्या तक्रारींना वैतागून नामी शक्कल काढली. आपण इंटरनेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच या त्रासासंदर्भात का कळवू नये? शेवटी झाला प्रकार त्यांचा टॉवर बंद पडला म्हणूनच झाला होता. मग दोन तीन टाळकी पळाली आणि शेजारच्या कोर्टातून त्यातल्या त्यात चांगला इंग्रजी येणारा वकील पकडून आणला. काकांनी त्याला लांबून पाहिला आणि "हां ढवळ्या होय.. ग्यानगेलेला आहे हा" अशी आम्हाला त्याची ओळख सांगितली.
तर ढवळे वकील आला. "the failure of your tower has caused us great trouble today" अशा आशयाचा कच्चा मसुदा तयार झाला. पण पाठवायचे कुणाला? सगळ्यांनी सीनियर कारकुनाकडे पाहिले. "आणखी कुणाला?" इति सिनियर कारकून. आणि ढवळे टाइप करायला लागला..
"Dear Anil Ambani,.."

हा सगळा प्रकार पाहून आम्ही परतलो. पुन्हा एकदा शनिवारची डेट मिळाली. आमचा लवाजमा बाबांना सावरत तिथे हजर. इंटरनेट सुरळीत होते. बहुधा सर्वज्ञानी श्री श्री अनिल अम्बानीने पुअर नेटीवांची आर्त हाक ऐकली असावी. आमचा नंबर आला. दस्त पाहतोय तर आधीच्या करारनाम्यात फेरफार होते. प्रतीवाद्यांना तिथेच जाब विचारला. मग एकमेकांच्या (म्हंजे खरेतर एकाच) कुळाचा उद्धार करण्यात आला आणि आम्ही महत्प्रयासाने जुळवलेली नात्यांची शिवण डोळ्यादेखत टराटरा उसवली.
_*_

[1] एकदा माझ्या मित्राला असेच MSEB च्या कार्यालयात जावे लागले. त्याला एका महिन्यात ४५०० च्या वर बिल लावले होते. तिथे मुद्दा सोडून तावातावाने बोलल्यावर आणखी काय होणार? आला बाहेर असाच. मग आम्ही दोघे असेच कार्यालयाबाहेर डोके खाजवत बसलो. आमच्या एका मित्राच्या मित्राला फोन लावला. तो MSEB तच मुंबईला होता. तो म्हंटला की शांतपणे आताचे आणि आधीचे रीडिंग आणून दाखवा. मग दोन तीनदा त्याची बिल्स बघितली तेव्हा लक्षात आले की ज्या महिन्याचे बिल जास्त लावले होते त्या महिन्यापेक्षा नंतरच्या महिन्याचे रीडिंग कमी होते. मीटर उलटा तर पळू शकत नाही. मग अशा प्रकारे तर्क लावल्यावर तिथल्या सायबाने ऐकून घेतले आणि त्या महिन्याचे बिल सरासरीएवढे करून दिले. च्यायला त्या वेळी खतरनाक भारी वाटले होते. त्यावर माझा मित्र म्हटला होता की 'ज्याचे काम अडलेले असते त्याचे डोके कधीकधी बधीर होते. म्हणून एकसे भले दो'.

चित्रे आंतरजालावरून साभार.

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. प्रतिसादाबद्दल अनेक आभार तृप्ती!
      तो सगळा माहौल बघून माझीही अशीच अवस्था झाली होती. :)

      हटवा
  2. Nice, Entertaining and informative Blog.
    This time I have managed to read it completely;), but still I can not correlate the title with it(My Marathi command is not to boast @ tho).
    I noticed that you are now talking economy of good governance..must b something to do with your nascent new love for economics.

    उत्तर द्याहटवा
  3. मित्र आशिष शेटे ,
    तुमच्याकडे डोंगल नव्हते का ? असले असते तर श्रीयुत अनिल अंबानी यांना त्रास देण्याची वेळ नसती.

    उत्तर द्याहटवा
  4. अमोल, मुस्तुचंद्र, अतुल,
    प्रतिसादाबद्दल अनेक आभार!

    उत्तर द्याहटवा
  5. ब्लॉग खुपच छान लिहिलाय आणि उपाय पण.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक