संघटन शक्तीची गरज काय?

कोरा.कॉम वरील या प्रश्नासाठी माझे उत्तर -


​फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात कंपनीच्या ऑफिशियल चॅट वर सकाळीच एका टीममेट चा मेसेज आला. "Hi Ashish, do you have some time today? need to talk".



आजकाल असे मेसेज आले कि कि धस्स होतं. त्यातल्या त्यात उत्कृष्ट काम करणारे सहकारी असतील तर जास्तच. अमेरिकेमध्ये जसे "ग्रेट रेसिग्नेशन" चालू आहे तसे भारतात सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये "ग्रेट स्विच" चालू आहे. लोक कंपन्या बदलतात, दुप्पट तिप्पट पगार वाढवतात. त्यामुळे एखाद्याला टिकवून ठेवणे, किंवा राजीनामा आल्यावर रिटेन करणे म्हणजे महाकठीण काम बनले आहे.

आता हा सहकारी, सोयीसाठी त्याला "क्ष" म्हणू कंपनीत जॉईन होऊन फक्त तीन महिने झाले होते. पण पठ्ठा फ्रेशर असूनही कॉलेजमध्ये असतानाच स्वतःहुन कोर्सेस करून आला होता. त्यामुळे खरोखर एक चांगला सहकारी मिळाल्याचे टीम मॅनेजर म्हणून मला आणि बाकी टीमला देखील समाधान होते. अगदी काही दिवसाच्या अवधीतच त्याने कोड बेस समजून नवीन डेव्हलपमेंट देखील सुरु केली होती. संवादकौशल्य देखील उत्कृष्ट होते. नुकताच जॉईन झाल्यामुळे किमान २-३ वर्षे तरी कंपनीत असणार म्हणून माझ्या मनात त्याच्यासाठी आधीच योजना तयार झाली होती. त्यात हा अपशकुनी मेसेज म्हणजे दुधात मीठाचा खडा.

'क्ष' बरोबरच्या मीटिंग मध्ये त्याने मनातल्या शंकेवर शिक्कामोर्तब केले. "अरे पण 'क्ष' तू आताच कुठे आलाय, लगेच चालला पण. कुणी जास्त पॅकेज दिले म्हणून असे आततायीपणे जॉब स्विच करणे करियर साठी चांगले नाही" मी त्याला म्हणालो. त्यावर 'क्ष' म्हणे कि "दुसऱ्या जॉब साठी राजीनामा नाही देत आहे आशिष. मला अमेरिकेला जायचेय".

अच्छा. मी अशापण डझनभर केसेस बघितल्या आहेत. कॅम्पस मधून किंवा डिग्री नंतर लगेचच जॉब पाहतात पण काहींचे मुख्य ध्येय अमेरिकेत जाऊन MS करण्याचे असते. पण ही प्रजाती १-२ वर्षे तरी थांबते. त्यांना रेकमेंडेशन लेटर हवे असते, काम केल्याचा अनुभव देखील ऍडमिशन साठी कामी येतो. शिवाय GRE, TOEFL ची तयारी करून चांगला स्कोर येईपर्यंत एक-दीड वर्ष जाणार असते. हे समजावल्यावर यातले काही बहाद्दर थांबतात हे माझे इतक्या वर्षाचे निरीक्षण. मी माझ्या नेहमीच्या भाषणाची तयारी केली. "MS ला जाणार असशील तर ऐक" असे म्हंटल्यावर "क्ष" ने सांगितले कि तसं काही नाहीये. पुढे त्याने जे सांगितले ते मी कधीच प्रत्यक्ष अनुभवले नव्हते.

'क्ष' च्या अमेरिकास्थित मावशीने १५ वर्षांपूर्वी 'क्ष' आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा आणि त्यांच्या आणखी एक नातेवाईक कुटुंबाच्या F4 इमिग्रेशन व्हिसासाठी अर्ज करून ठेवला होता. एकूण ११ जणांच्या या प्रकरणाची ही फाईल नेमकी याच वर्षी उघडण्यात आली होती. 'क्ष' आणि संपूर्ण कुटुंबाला आता पळापळ करून कागदपत्र जमा करणे, इथल्या स्थावर-जंगम मालमत्तेची व्यवस्था करणे, व्हेरिफिकेशन अशी कामे महिन्याभरात पूर्ण करून तिकडे जावे लागणार होते. मार्च महिनाअखेरीस तर हे सगळे तिकडे पोहोचणार देखील होते.

हे ऐकल्यावर मला तर विश्वास ठेवणे अवघड गेले. हे असे मी पहिल्यांदाच ऐकत होतो. एक दोनदा त्याला विचारले देखील समोरची कंपनी जास्त देत असेल तर आपण एक डायरेक्टर राउंड करून तुझा पगार वाढवून घेऊ. पण 'क्ष' खरेच सांगत होता. त्याचे आडनाव 'पटेल' नसते तर हे सगळे मला पटायला खूप कष्ट पडले असते.

                                                                     ----------------

'क्ष' ची अमेरिकास्थित मावशी आणि तिच्या कुटुंबाचा मोटेल्स चा व्यवसाय आहे. महिन्याभराने 'क्ष' सागितल्याप्रमाणे अमेरिकेत पोचला.



तसे पहिले तर 'क्ष' ला ह्या व्हिसाची लॉटरी लागली नसती तरी देखील स्वतःहून तिथे जाण्याइतपत त्यांची क्षमता नक्कीच होती आणि त्याचा भाऊदेखील आधीच अमेरिकन कंपनीमध्ये होता. आता हे सगळे तिथे जाऊन मोटेल्सच काढतील का, माहीत नाही. पण पटेल मोटेल कार्टेल सारखे अमेरिकेत आहे आणि अमेरिकेतील ४२% हॉटेल्स चा व्यवसाय गुजराथी, मारवाडी समाजाकडे आहे अशी ऐकीव माहीत आहे.

यावरून काही गोष्टी स्वच्छ समजल्या. मारवाडी, पटेल समाजाकडे धंदेवाले लोक म्हणून मी पाहतो. कधी कधी नकळत असा समज व्हायचा कि हे लोक नुसते धंदा धंदा करतात आणि यांना इंजिनियरिंग किंवा तत्सम तांत्रिक जटील गोष्टीमध्ये एवढा रस नसेल. 'क्ष' च्या उदाहरणांतून या चुकीच्या धारणांची धूळ झटकली जाते.

आणखी एक नाही तर दोन-दोन कुटुंबाचा अमेरिकन व्हिसा मिळवणे हि काय साधी गोष्ट नाही. आपले भले झाले तर आपल्या आप्तेष्टांना देखील वर घेत यशाची शिखरे सर करणाऱ्या या पटेल, मारवाडी समाजचे कौतुकच वाटते. आज हा पटेल मारवाडी समाज भारतीय काय अमेरिकन अर्थव्यवस्थेचा देखील महत्त्वाचा भाग असेल. वर डॉक्टर्स, इंजिनीयर्स आहेतच. त्यांचे हितसंबध जपणाऱ्या लॉबी आहेत.



गया बिहार इथल्या समाजाबद्दल ऐकून आहे. गरीब विणकरांच्या या समाजातून ८०-९० च्या दशकात पहिल्यांदा कोणीतरी आयआयटीयन झाले आणि आता इथली पिढीच्या पिढी एकमेकांच्या सहकार्याने आयआयटी मधून अमेरिकेत वा इतरत्र बस्तान बसवत आहे. सिंधी आणि बोहरी समाज देखील एका सामायिक धाग्याने बांधल्यासारखा वाटतो. स्वतःच्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता एकमेकांना पुढे कसे आणता येईल याची ही काही चांगली उदाहरणे.

----------------

मला मराठी असण्याचा अभिमान आहे. पण कधीतरी खंत या गोष्टीची वाटते की आपल्या समाजात असली एकमेकांना उभे करण्याची उदाहरणे कमी दिसतात. काही बाबा, पंथ सोडले तर एक संघटना, एक ध्येय, स्वतःच्या अनुभवांचा दुसऱ्याला फायदा करून देण्याची वृत्ती कमी आढळते. माफ करा, कदाचित मी सामान्य विधान (generalization) करायला नाही पाहिजे, परंतु बाकीच्या समाजाची उदाहरणे पाहिली तर मराठी समाजाच्या या त्रुटी ठळक दिसून येतात. मराठी समाजात व्यवसाय, बिझनेस, आयआयटी, देशाटन यासाठी संघटन, नेटवर्किंग झाल्याचे ऐकिवात नाही. कदाचित "हे विश्वचि माझे घर" म्हणून आपल्याला आपल्या समाजापुरता विचार करण्याचे आवडत नसेल. तरीही, संघटनेच्या फायद्यांकडे डोळेझाक तर नाहीच करता येणार.

मागील वर्षी कोरावर सुरु झालेल्या आषाढी च्या उद्योजकता वारीकडून मलातरी ही संघटना अपेक्षित आहे. वर्षभरात आषाढीने 'अक्षत' च्या रूपाने एका कंपनीला जन्म दिला. २०० च्या वर मराठीजन 'उद्योजकता' या ध्येयासाठी जोडले गेले. मी या मानसिकतेतून आषाढीचा भाग झालो. मागील वर्षात अक्षत च्या कामानिमित्ताने किंवा आषाढीच्या मिटींग्स मधून मला माझ्याक्षेत्रातील आणि आणखी विविध क्षेत्रातील व्यक्ती भेटल्या. मला खात्री आहे की जगभरातील आपले यशस्वी मराठीजन या वारीमध्ये येऊन आणखी चांगल्या प्रकारे हि चळवळ पुढे नेतील. संघटनेचे बळ नक्कीच आपल्या या आणि येत्या पिढ्यांसाठी एक हक्काचे घर तयार करतील. आणि काही दशकातच मराठी समाज देखील एक उद्योजक समाज म्हणून नावारूपाला येईल. हे संघटनेशिवाय कसे शक्य होईल?

टिप्पण्या